By: school companion team
शिक्षणाशी जोडलेले राहण्यासाठी आम्हाला फॉलो करा :
नमस्कार मित्रांनो, आज आपण सावित्रीबाई फुले यांच्याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या माहितीच्या आधारे तुम्ही 'सावित्रीबाई फुले मराठी निबंध' किंवा सावित्रीबाई फुले मराठी भाषण' लिहू शकता,अशी खात्री वाटते.
भारतीय स्त्री मुक्तीच्या व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, प्रथम शिक्षिका, थोर समाजसुधारक, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा 3 जानेवारी हा जन्मदिवस. मुलींना, स्रियांना प्रेरणा मिळावी म्हणून त्यांचा जन्मदिवस 'बालिका दिन' म्हणूनही साजरा केला जातो.
स्रियांच्या उध्दाराकरता जीवनभर कार्यरत राहणाऱ्या थोर माता, दिन दलितांची माऊली, रंजल्या गांजल्यांची सावली सावित्रीबाई यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात नायगाव येथे 3 जानेवारी 1831 साली झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे तर आईचे नाव सत्यवती (लक्ष्मीबाई) असे होते.
1840 साली सावित्रीबाई यांचा विवाह ज्योतिराव फुले यांच्याबरोबर झाला. त्यावेळी सावित्रीबाई 9 वर्षाच्या तर ज्योतिराव हे तेरा वर्षांचे होते. ज्योतिराव फुलेंचा चुकीच्या रूढी आणि परंपरांना विरोध होता. त्यांचा पिंड हा समाजसुधारणेचा होता. पुरुषांप्रमाणे स्रियांनाही शिक्षण घेण्याचा हक्क आहे असे त्यांनी सावित्रीबाईंना सांगितले. त्यांनी पत्नी सावित्रीबाई व मावस बहीण सगुणाबाई क्षीरसागर यांना धुळपाटीवर अक्षरे गिरवण्यास शिकवले. त्या काळात मुलींना शिकवणे पाप समजले जायचे. कर्मठ समाजाचा सावित्रीबाईंच्या शिक्षण घेण्यालाही खूप विरोध झाला. लोक त्यांचा 'धर्मबुडवे' म्हणून उल्लेख करू लागले. तरीसुध्दा सावित्रीबाई मागे हटल्या नाहीत. त्यांनी आपले शिक्षण चालू ठेवले.
1 जानेवारी 1848 साली पुण्यातील भिडेवाड्यात सावित्रीबाईंनी मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. त्या दररोज या शाळेत मुलींना शिकवण्यासाठी जात. समाजातील लोकांना ही गोष्ट मान्य नव्हती. ते सावित्रीबाईंना शिव्या घ्यायचे. त्यांच्यावर दगड, गोटे, शेण फेकायचे. पण सावित्रीबाई कधीच थांबल्या नाहीत. त्यांनी आपले कार्य चालूच ठेवले. त्या लोकांना ठणकावून सांगायच्या, " तुम्ही कितीही त्रास दिला तरी, मी हाती घेतलेले हे स्त्रीशिक्षणाचे काम थांबवणार नाही."पुढच्या काळात त्यांनी 18 शाळा काढल्या. त्या काळात जे अशक्य होते ते त्यांनी शक्य करून दाखवले. 1852 साली त्यांना 'आदर्श शिक्षिका' हा पुरस्कार देण्यात आला.
समाजातील प्रत्येक घटकाला शिक्षणाच्या प्रवाहात आणायचे असेल तर इतर सामाजिक क्षेत्रांतही काम करणे गरजेचे आहे, ही गोष्ट सावित्रीबाईंनी ओळखली. त्या काळात 'बाल-जरठ' विवाह पद्धत होती. त्यामुळे अनेक मुली बालवयातच विधवा होत असत. ब्राह्मण समाजात विधवा पुनर्विवाहाला मान्यता नव्हती. अशा विधवा मुलींना एक तर सती जावे लागे किंवा केशवपन करून त्यांना कुरूप बनवले जात असे. या विधवा महिलांच्या पुनर्वसनासाठी सावित्रीबाई व ज्योतिराव यांनी प्रयत्न केले. केशवपन ही दुष्ट परंपरा बंद होण्यासाठी नाभिक समाजाचे मनपरिवर्तन घडवून आणले. अशाच काशीबाई या ब्राह्मण विधवा महिलेच्या मुलाला या दाम्पत्याने दत्तक घेतले. त्याचे नाव यशवंत ठेवले.त्या काळात सावित्रीबाईंची ही कृती म्हणजे एक मोठा आदर्शच होता.
1876 साली महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता. या दुष्काळात या दोघांनीही लोकांना सर्वोत्तपरी मदत केली. अस्पृश्य समाजातील लोकांसाठी आपल्या घरातील हौद खुला करून दिला. 1897 साली पुण्यात प्लेगची साथ सुरू झाली. त्या साथीत त्यांनी रुग्णसेवा केली. त्यातच त्यांना प्लेगची लागण झाली. 10 मार्च 1897 रोजी दिन दलितांची मायमाऊली, स्रियांच्या उद्धारासाठी अहोरात्र धडपडणारी सावली कोसळून पडली.
क्रांतिसूर्य, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचार आणि कार्याला कोटी कोटी प्रणाम.
0 Comments