Ticker

6/recent/ticker-posts

गुरुपौर्णिमा माहिती | गुरुपौर्णिमा निबंध | गुरुपौर्णिमा भाषण | Essay on gurupurnima |

 

                 By: school companion team


शिक्षणाशी जोडलेले राहण्यासाठी आम्हाला फॉलो करा :



 





----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
गुरुपौर्णिमा माहिती, निबंध, भाषण



मराठी वर्षातील आषाढ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. कारण अवघ्या देशभरात ही पौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. 


अगदी प्राचीन काळापासून आपला हिंदू धर्म अस्तित्वात आहे. हिंदू धर्मामध्ये व्यास महर्षी यांना 'आद्य गुरू' समजले जाते. व्यास महर्षी हे अतिशय ज्ञानी, व्यासंगी, तपस्वी ऋषी होते. त्यांनी 'महाभारत' हा महान ग्रंथ लिहिला. आज आपण कोणताही विचार मांडला तरी त्यावर व्यासांनी आधीच विचारमंथन केलेले आहे असे पूर्वजांनी म्हटले आहे. आषाढातील शुक्ल पक्षात पौर्णिमेला म्हणजे आजच्याच दिवशी त्यांनी 'ब्रह्मसूत्रांचे' लेखन पूर्ण केले,असे समजले जाते. तसेच आजच्याच दिवशी व्यास महर्षी यांचा जन्म झाला अशीही आख्यायिका आहे. आणि म्हणूनच हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. वर सांगितलेल्या कारणामुळे हाच दिवस 'व्यासपौर्णिमा' म्हणूनही साजरा केला जातो.


         गुरू ब्रह्म गुरुरविष्णु | गुरू देव महेश्वर: |
         गुरू साक्षात परब्रह्म | तैस्मय श्री गुरुवे नम: |


या श्लोकामध्ये गुरुबद्दलची महती वर्णन केली आहे. गुरू हाच साक्षात ब्रह्म आहे.गुरूला थेट देवाची उपमा यामध्ये दिली आहे.गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुबद्दल आभार व्यक्त करण्याची प्रथा रूढ झालेली आहे. गुरूंची महानता मान्य करण्याचा हा दिवस आहे. या दिवसाचे औचित्य साधून शिष्य आपल्या गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. या पवित्र दिवशी आपण आपल्या गुरुबद्दल आदर, प्रेमभावना व्यक्त करायची असते. गुरूंचे मंगलमय आशिर्वाद घ्यायचे असतात.


आपले आई, वडील आपल्याला जन्म देतात. आपल्याला जगायला शिकवतात. या अर्थाने ते दोघेही आपले अनौपचारिक गुरुच असतात. पण थोडे मोठे झाल्यावर या जीवनप्रवासात आपल्या नौकेला योग्य दिशा देण्याचे काम गुरूंकडून केले जाते. जीवन जगतांना योग्य निर्णय घेणे खूप महत्वाचे असते. गुरू आपल्याला योग्य निर्णय घेण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करतात. त्यातून आपल्या विचारांची योग्य बैठक तयार होते. आपण आपल्या पुरती काही तत्वे ठरवू शकतो. गुरू स्वतःचे सारे ज्ञान शिष्याला देतात.ज्ञानरुपी दानाने गुरू अमर होतात.अशाप्रकारे गुरूंची महती वर्णावी तेव्हढी कमीच आहे.


व्यास आणि गणेश, समर्थ रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज, वशिष्ठ आणि राम, द्रोणाचार्य आणि अर्जुन, द्रोणाचार्य आणि एकलव्य  ही गुरू-शिष्य परंपरेतील उदाहरणे गुरूंच्या योगदानाबद्दल आपल्याला खूप काही सांगून जातात.


असे म्हटले जाते की, गुरुविना ज्ञान नाही,ज्ञानाविना शांती नाही, आणि शांतीविना आंनद नाही. भारतीय संस्कृतीने गुरूंची महानता मान्य करून गुरूंचा जयजयकार केला आहे.


आणि म्हणूनच, गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या आयुष्याला योग्य दिशा देणाऱ्या गुरूंचे, शिक्षकांचे आभार मानायला हवेत. त्यांचे आशिर्वाद आपल्या आयुष्यात नवचैतन्य निर्माण करतील यात शंका नाही.


तुम्हांला गुरुपौर्णिमा माहिती ( gurupurnima mahiti ) / गुरुपौर्णिमा निबंध (gurupurnima nibandh) / गुरुपौर्णिमा भाषण कसे वाटले ते खाली कमेंट करून नक्की सांगा. आणखी कोणत्या विषयावर निबंध वाचायला आवडेल तेही सांगा.

हे ही वाचा : आषाढी एकादशी माहिती | आषाढी एकादशी निबंध | आषाढी एकादशी भाषण |






Post a Comment

0 Comments