By: school companion team
आज आपण रक्षाबंधन या सणाविषयी मराठीत माहिती मिळवणार आहोत. ही माहिती वाचून तुम्ही 'रक्षाबंधन निबंध' (essay on rakshabadhan in marathi) लिहू शकता.
आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये श्रावण महिन्याला विशेष महत्व प्राप्त झालेले आहे. श्रावण महिना म्हणजे सणवार, धर्मकर्म, विविध व्रतवैकल्ये ! श्रावण महिन्यातील सर्वात मोठा आणि महत्वाचा सण म्हणजे रक्षाबंधन. श्रावण महिन्यात पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. याच पौर्णिमेला 'नारळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. बहिणभावाच्या अतूट प्रेमाची साक्ष देणारा सण म्हणजे रक्षाबंधन होय.
प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीत 'रक्षाबंधन' हा सण साजरा केला जातो, असे समजते. या सणाविषयी वेगवेगळ्या आख्यायिका सांगितल्या जातात. महाभारतामध्ये युद्ध चालू असताना श्रीकृष्णाच्या बोटाला जखम झालेली असते. बोटातून रक्त वाहायला लागते. श्रीकृष्णाला सुदर्शन चक्र चालवता येत नव्हते. द्रौपदी हे बघते आणि कोणताही विचार न करता आपल्या साडीची किनार फाडते व श्रीकृष्णाच्या बोटाला बांधते. तेव्हापासून श्रीकृष्णाने द्रौपदीला आपली बहीण मानले. आणि पुढे भावाच्या नात्याने आयुष्यभर संरक्षण केले. दुसऱ्या एका आख्यायिकामध्ये असे सांगितले जाते की इंद्र आणि दानव यांच्यात युद्ध चालू असते. यावेळी इंद्र युद्धात जवळजवळ हारत आलेला असतो. अशावेळी इंद्र ऋषी बृहस्पतींकडे धाव घेतात. तेव्हा ऋषी बृहस्पतींच्या सांगण्यावरून इंद्राची बायको शची (इंद्राणी) इंद्राच्या उजव्या हातावर एक रेशीम धागा (रक्षासूत्र) बांधते. हा दिवस श्रावण पौर्णिमेचा होता. त्यामुळे पुढे युध्दात सहभागी होण्यासाठी निघालेल्या आपल्या पतीच्या हातावर राक्षसूत्र बांधण्याची प्रथा सुरू झाली. अशाप्रकारे रक्षाबंधन हा सण प्राचीन भारतीय संस्कृती व परंपरेचे द्योतक आहे.तसेच भारतीय स्त्रीचे समाजातील महत्वपूर्ण स्थान सूचित करणारा सण आहे. राखीचा मंगलमय धागा स्त्रीच्या शक्ती व उपासनेचा प्रतीक आहे.
आजच्या काळात बहीणभावात असणाऱ्या हळुवार, प्रेमाच्या नात्यासाठी 'रक्षाबंधन' हा सण ओळखला जातो.दरवर्षी हा सण आपल्याला बहीणभावातील अतूट प्रेमाची आठवण करून देत असतो. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हातावर राखी बांधते. त्याला कुंकवाचा तिलक लावते. पूजेचे ताट घेऊन आपल्या भावाचे औक्षण करते.पूजेच्या ताटात अक्षदा, सोने, दिवा, गोड प्रसाद असतो. औक्षण झाल्यावर बहीण आपल्या भावाला गोड प्रसाद भरवते. बहीण आपल्या भावसाठी मनोमन शुभकामना प्रकट करते. राखी बांधल्याबरोबर भावाच्या हृदयात बहिणीबद्दल आपले कर्तव्य व जबाबदारीचा भाव व्यक्त होतो. भाऊ बहिणीला छानशी भेटवस्तू देतो. तसेच कोणत्याही सुख दुःखात तुझ्या पाठीशी मी निरंतर उभा असल्याचं आश्वासन देतो. ज्या स्त्रीला भाऊ नसतो ती आपल्या मानलेल्या भावाला राखी बांधते.
आजच्या आधुनिक काळात रक्षाबंधनासारख्या पवित्र सणाचे महत्व आणखीनच अधोरेखित होते. स्त्री आणि पुरुषांमध्ये स्नेहाचे, विश्वासाचे, परस्पर सहकार्याचे नाते असायला हवे हेच जणू हा सण आपल्याला सांगत आहे. प्रत्येकाने या सणाचे पावित्र्य व मांगल्य समजून घेऊन परस्परांशी नाती टिकवण्याचा प्रयत्न केला तर 'रक्षाबंधन' या सणाचा उद्देश साध्य झाला असे म्हणता येईल.
0 Comments